रत्नागिरी : आयुर्वेदतज्ज्ञ अविनाश देवधर (डोंबिवली) यांचे व्याख्यान एक डिसेंबर रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘आयुर्वेद नव्या स्वरूपात - काळाची गरज’ या विषयावर ते बोलणार आहेत. सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत जोशी पाळंद येथील मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हे व्याख्यान होणार आहे.
देवधर १९७७मध्ये बॅचलर इन फार्मसी झाले. त्यांना विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या विभागात काम करण्याचा, तसेच आयुर्वेदीय औषधांच्या मार्केटिंगचा अनुभव आहे. ते आयुर्वेदाचे अभ्यासक असून, मराठी विज्ञान परिषदेचे २००२पासून कार्यवाह आहेत. २००५ ते २००८ या काळात डोंबिवली विवेकानंद केंद्राचे काम त्यांनी केले असून, सध्या वनस्पती औषधी अभ्यास व मार्गदर्शन करत आहेत.
देशात प्रचंड प्रमाणात औषधी वनस्पती असूनही आपल्याला सिंथेटिक औषधांची खरेच गरज आहे का, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, हर्बल औषधी यातील फरक व वेगळेपण या विषयांवर देवधर व्याख्यान देणार आहेत. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती, तिचा वापर कसा करून घ्यायचा, कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याचे महत्त्व, आयुर्वेदाविषयी चुकीच्या कल्पना, तत्काळ गुण देणारी आयुर्वेदातील औषधे यांचा ऊहापोह ते करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कोषाध्यक्ष राधिका वैद्य यांनी केले आहे.
ब्राह्मण ज्ञातिबांधवांसाठी ३० नोव्हेंबरला व्याख्यान
फक्त ब्राह्मण ज्ञातिबांधवांसाठी देवधर यांचे व्याख्यान ३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत होणार आहे. सद्यस्थितीतील नित्यकर्म, त्यामागील विज्ञान, ब्राह्मण समाजाची उद्दिष्टे, जबाबदारी व कर्तव्य या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. ब्राह्मणांकडे असलेली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, विवेकबुद्धी, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, नैतिकता, समाजाला आदर वाटावा असे विविध गुण कसे व कोणामुळे मिळाले या संदर्भात ते बोलणार आहेत. या वेळी जास्तीत जास्त ब्रह्मवृंदाने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने केले आहे.